मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी २ वाजता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफी आणि महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. या आश्वासनांची पूर्तता होते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अजित पवार विक्रमाच्या उंबरठ्यावर
अर्थमंत्री म्हणून अजित पवार आज त्यांच्या कारकिर्दीतील ११ वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या आधी महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा (१३) अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे. अजित पवार हे त्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून पुढील काही वर्षांत ते हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. जयंत पाटील (१०) आणि सुशीलकुमार शिंदे (९) वेळा अर्थसंकल्प सादर करून त्यांच्या पाठोपाठ आहेत.
महिला आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा अपेक्षित
या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार महिलांना दरमहा २१०० रुपये मिळतील का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीसाठी अनुदान, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती यांसारख्या मुद्द्यांवर सरकार काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अजित पवारांचा आर्थिक शिस्तीचा अनुभव
अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळेच कोविड काळात महाराष्ट्र आर्थिक अडचणीत सापडला नाही. त्यामुळे यंदाही ते लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या आर्थिक शिस्तीवर कोणताही परिणाम होऊ देणार नाहीत, असे मानले जात आहे. आता या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*