छत्रपती संभाजीनगर : शहरातील बायजीपुरा परिसरात आज शनिवारी पहाटे दुचाकीच्या वादातून दोन तरुणांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सलमान खान आरेफ खान (30) आणि त्याचा साला सुलतान शेख ईसा (17) अशी हत्या झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, ही घटना घडताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि अवघ्या आठ तासांच्या आत आरोपी शेख आसिफ शेख हाफिज (24, रा. सिल्लोड) याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अधिकची माहिती अशी की, काल रात्री 12.30 वाजता शेख आसिफ शेख हाफिज (रा. सिल्लोड) याचा फोन आला होता. त्यावेळी सुलतानने त्याची गाडी परत न दिल्याचा राग त्याने बोलून दाखवला होता आणि सुलतानला सोडणार नसल्याची धमकी दिली होती.
सकाळी 7 वाजता इम्रान खान यांना त्यांच्या चुलत भावाने सलमान व सुलतानवर हल्ला झाल्याची माहिती दिली. सलमान घटनास्थळीच ठार झाला तर सुलतानचा घाटी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. दोघांवर दगडाने ठेचून अत्यंत निर्घृणपणे हल्ला करण्यात आला होता.

या घटनेत पुढील तपास सुरू असतानाच आता मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शेख आसिफ शेख हाफिज यास छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अवघ्या ८ तासांत सिल्लोड येथून अटक केली आहे. आरोपी हा गुन्हा करून सिल्लोड येथे पळून गेला होता. गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा मिळवून त्याला पकडण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी घेतलेल्या तात्काळ कारवाईबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही शरिराविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास जिन्सी पोलीस करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*