छत्रपती संभाजीनगर – आज शुक्रवार, २५ एप्रिल हा दिवस विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचा ठरत आहे. माध्यमिक शाळांमधील २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षेचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्यापासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्यांचा आनंद घेता येणार आहे. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा संपण्याआधीच सुट्टीच्या योजनांना सुरुवात केली असून, शाळांमध्ये सुट्टीची लगबग पाहायला मिळत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना विश्रांती मिळणार असली, तरी यंदा परीक्षा उशिरा घेतल्यामुळे सुट्ट्यांमध्ये थोडी घट झाली आहे. याआधीच सीबीएसई व इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी २४ एप्रिलपासूनच सुट्या सुरू केल्या आहेत.
यंदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) ने सर्व शाळांना अंतिम सत्र परीक्षा व पॅट चाचणीसाठी एकत्रित तारखा दिल्या होत्या. यानुसार ८ एप्रिलपासून आज २५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्यात आल्या. शिक्षण विभागाच्या नियमानुसार, एका शैक्षणिक वर्षात किमान २२० दिवस अध्यापन होणे आवश्यक आहे. मात्र, यापूर्वी अनेक शाळांमध्ये हे नियम पाळले जात नव्हते. त्यामुळे यंदा परीक्षा काहीशा उशिरा घेण्यात आल्या.
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, परीक्षेचा निकाल १ मे रोजी जाहीर होणार असून, त्यानंतर २ मेपासून शिक्षकांनाही उन्हाळी सुट्यांचा लाभ घेता येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार आहे.
उन्हाळी सुट्यांमध्ये काही शाळा कार्यशाळा, कौशल्यविकास वर्ग व इतर उपक्रम आयोजित करण्याची शक्यता आहे. दरम्यान, परीक्षेनंतरचा मोकळा वेळ विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही नव्या ऊर्जेसह नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्ज होण्याची संधी देतो.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*