मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रार्थनास्थळांवर भोंगे वाजविण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे बंद असले पाहिजेत. विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य देवयानी फरांदे यांनी अनधिकृत भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या चर्चेत सदस्य अतुल भातखळकर यांनीही सहभाग घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संबंधित पोलीस निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील भोंग्यांबाबत नियमांचे पालन होत आहे का, याची जबाबदारी दिली आहे. जर तक्रारी आल्या आणि योग्य ती कारवाई झाली नाही, तर संबंधित पोलीस निरीक्षकावर जबाबदारी निश्चित केली जाईल.
राज्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ आणि ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० अन्वये कार्यवाही केली जात आहे. यानुसार, दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल ही आवाजाची मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे.
सर्व पोलीस ठाण्यांना आवाजाची मर्यादा तपासण्यासाठी मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे वापरण्यावर पूर्णत: बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे भोंगे जप्त करण्यात येतील.
तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी आणि प्रकरणाचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवावा. मंडळाच्या पडताळणीनंतर आवश्यकतेनुसार संबंधित न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*