मुंबई : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू (Vivek Lagoo) यांचे निधन झाले आहे. त्यांनी गुरुवारी (१९ जून २०२५) संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी कलाजगतात शोककळा पसरली आहे. आज (शुक्रवार, २० जून) मुंबईच्या अंधेरीतील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विवेक लागू हे ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू (Reema Lagoo) यांचे माजी पती होते. अभिनेत्री व लेखिका मृण्मयी लागू या त्यांची कन्या आहे. ‘व्हॉट अबाऊट सावरकर’, ‘अग्ली’, ‘३१ दिवस’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपली वेगळी छाप पाडली. तसेच, ‘चार दिवस सासूचे’, ‘हे मन बावरे’ यांसारख्या मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
पुण्यात जन्मलेले विवेक लागू यांना सुरुवातीपासूनच लेखन आणि दिग्दर्शनाची आवड होती. हीच आवड त्यांना मुंबईत घेऊन आली. रंगभूमीवरून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ‘चल आटप लवकर’, ‘प्रकरण दुसरं’, ‘सर्वस्वी तुझीच’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांचे लेखनही त्यांनी केले होते. या नाटकांना विविध पुरस्कारही लाभले होते.
अभिनयात येण्यामागेही एक खास किस्सा आहे. विजय मेहता यांच्या अभिनय कार्यशाळेत केवळ १ महिना मोफत वास्तव्य मिळणार असल्याने त्यांनी त्या शिबिरात प्रवेश घेतला आणि अभिनय शिकण्यास सुरुवात केली. हळूहळू अभिनय हेच त्यांच्या आयुष्याचं केंद्र बनलं आणि त्यांनी या क्षेत्रातही अनेक पुरस्कार पटकावले.
२०१७ मध्ये रीमा लागू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. विवेक लागू आणि रीमा लागू यांचं १९७८ मध्ये लग्न झालं होतं, मात्र काही वर्षांनी ते वेगळे झाले. त्यांची कन्या मृण्मयी लागू ही सध्या एक यशस्वी लेखिका असून ‘थप्पड’, ‘स्कूप’ सारख्या चित्रपटांचे लेखन तिने केले आहे.
विवेक लागू यांच्या निधनाने मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान कलावंत हरपला आहे. त्यांच्या योगदानाची आठवण कायम राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*