आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशातील जनतेला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी आणि तरुणांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. महिलांसाठी ‘लखपती दीदी’ योजना, तरुणांसाठी रोजगारनिर्मितीच्या योजना आणि शेतकऱ्यांसाठी सहाय्यकारी उपायांची माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान मोदींनी यावेळी पंतप्रधान विकसित भारत योजना सुरु करण्याची घोषणा केली. या योजनेसाठी तब्बल १ लाख कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे. या योजनेंतर्गत देशातील ३.५ कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सर्वात मोठी घोषणा म्हणजे खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकारकडून १५,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचा उद्देश तरुणांना पहिली नोकरी मिळविण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.
महिलांसाठी लखपती दीदी योजना कार्यान्वित करण्यात आली असून यामध्ये महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवण्यासाठी विशेष मदत मिळणार आहे. तसेच, शेतकऱ्यांसाठीही विविध योजनांची अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोदींनी दिवाळीनिमित्त सर्वसामान्यांसाठीही एक मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, आगामी दिवाळीत जीएसटी सुधारणा करण्यात येणार आहेत. यामध्ये जीएसटी दरांचा आढावा घेतला जाईल आणि काही कर दर कमी केले जातील. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि व्यवहार अधिक सोपे होतील.
पंतप्रधानांच्या या घोषणांमुळे तरुणांमध्ये रोजगाराबाबत उत्साह वाढला असून महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठीही हा स्वातंत्र्यदिन विशेष ठरला आहे. देशाच्या विकासाला गती देणाऱ्या या योजनांमुळे रोजगार, आर्थिक स्थैर्य आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*