छत्रपती संभाजीनगर : इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम आता भारतासह महाराष्ट्रातील काही भागांतही जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाच्या निदर्शनास आलेल्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना गॅसचा जपून आणि नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन केले आहे. काही भागांत गॅस मिळण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असली, तरी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, पाणीटंचाईच्या काळात जसे नागरिक पाण्याचा काटकसरीने वापर करतात, त्याचप्रमाणे सध्या गॅसचाही जपून वापर करण्याची गरज आहे. प्रत्येक ग्राहकाने आवश्यक तेवढाच गॅस वापरला आणि अनावश्यक वापर टाळला, तर सर्वांना गॅस पुरेसा उपलब्ध होऊ शकतो.
दरम्यान, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून गॅस वितरण सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे. परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*