वैजापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातून खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या कचोऱ्यांमध्ये चक्क उंदराच्या लेंड्या आढळून आल्याचा आरोप ग्राहकाने केला आहे. विशेष म्हणजे, ग्राहकाने खरेदी केलेल्या पाचही कचोऱ्यांमध्ये हा प्रकार आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाने दुकानातून कचोऱ्या खरेदी केल्यानंतर त्या घरी नेल्या. कचोऱ्या खाताना त्यामध्ये उंदराच्या लेंड्यांसारखा पदार्थ आढळून आल्याचे ग्राहकाचे म्हणणे आहे. त्यानंतर ग्राहकाने तातडीने दुकानातील कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. कचोऱ्या दुकानात आणून दाखवल्यानंतर संबंधितांनी ते पार्सल फेकून दिल्याचा आरोपही ग्राहकाने केला आहे.
या खरेदीचा ऑनलाइन पेमेंटचा पुरावा आपल्याकडे असल्याचे ग्राहकाने सांगितले. तसेच, दुकानाकडून ‘आमच्याकडून चूक झाली,’ असे सांगण्यात आल्याचा दावा ग्राहकाने केला आहे. मात्र, खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेशी संबंधित हा गंभीर प्रकार असल्याने आपण अधिकृत तक्रार करणार असल्याचे ग्राहकाने स्पष्ट केले आहे.
या घटनेनंतर वैजापूर शहरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबरोबरच मिठाई व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांमधील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अन्नपदार्थांची साठवणूक, तयार करण्याची पद्धत आणि परिसरातील स्वच्छता याबाबत नियमांचे पालन केले जाते की नाही, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेतली जाणार का, संबंधित दुकानाची तपासणी होणार का आणि दोष आढळल्यास कोणती कारवाई केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांना सध्या वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर वैजापूरमधील या प्रकरणात प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*