छत्रपती संभाजीनगर : शहरातील मोठ्या इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि वाणिज्य आस्थापनांसाठी अग्निशमन यंत्रणा बसविणे बंधनकारक असून, महापालिकेच्या अग्निशमन विभागाची नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे अनिवार्य आहे. जर कोणत्याही आस्थापनाकडे एनओसी नसेल आणि भविष्यात आग लागली, तर महापालिका संबंधितांकडून दुप्पट शुल्क वसूल करणार आहे.
आगीच्या घटनांमध्ये वाढ
शहरात सध्या आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील आठवड्यात आझाद चौक येथे लागलेल्या आगीत लाकडी दुकानांचे मोठे नुकसान झाले. अशा घटना टाळण्यासाठी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे महत्त्वाचे आहे.
अग्निशमन शुल्क आणि उत्पन्न
महापालिकेचा अग्निशमन विभाग मोठ्या इमारती आणि वाणिज्य आस्थापनांकडून फायर सेवेसाठी शुल्क आकारतो. मात्र, अन्य मालमत्तांवर हे शुल्क लागू नाही. अग्निशमन विभागाला नाहरकत प्रमाणपत्र, फायर कॉल्स आणि अन्य परवानग्यांमधून उत्पन्न मिळते. यंदाच्या वर्षी हे उत्पन्न १५ कोटी रुपये गृहीत धरण्यात आले आहे.
एनओसी नसल्यास दुप्पट दंड
महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, फायर एनओसी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. जे व्यापारी किंवा नागरिक फायर एनओसी घेणार नाहीत आणि त्यांच्या आस्थापनेस आग लागल्यास, त्यांच्याकडून आग नियंत्रणासाठी दुप्पट शुल्क आकारण्यात येणार आहे.
६९ कोटींची तरतूद
महापालिकेच्या अर्थसंकल्पात अग्निशमन विभागाच्या सक्षमीकरणासाठी ६९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या या कठोर निर्णयामुळे नागरिकांनी फायर एनओसी घेऊन आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*