मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, अशा घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार २० कोटी रुपयांचा निधी सर्व विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला असून याबाबतची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.
राज्यातील अनेक भागांत नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कर्जवसुलीचा तगादा या मुख्य कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे समोर आले आहे. अशा दुर्दैवी घटनांमध्ये वारसांना तातडीने मदत देण्यासाठी महसूल, कृषी, गृह आणि सहकार विभागांच्या माध्यमातून तपासणी करून योग्य ती आर्थिक मदत केली जाते.
नवीन मंजूर निधीचे विभागवार वाटप पुढीलप्रमाणे आहे : कोकण विभागीय आयुक्तांना १२ लाख, पुणे विभागाला एक कोटी सहा लाख, नाशिक विभागाला तीन कोटी ३९ लाख, छत्रपती संभाजीनगर विभागाला चार कोटी ९२ लाख, अमरावती विभागाला सहा कोटी ७६ लाख आणि नागपूर विभागीय आयुक्तांना तीन कोटी ७५ लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या या पावलामुळे पीडित कुटुंबांना वेळीच आधार मिळणार असून त्यांचे दुःख थोड्याफार प्रमाणात हलके होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*