छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते अंकाई या ९२ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठीची कामे वेगात सुरू झाली आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे रेल्वे वाहतुकीत मोठी सुधारणा होणार असून, प्रवासी आणि मालवाहतूक दोन्ही क्षेत्रांत मोठी वाढ होणार आहे.
रेल्वेचे हे दुहेरीकरण अंकाई ते करंजगाव आणि करंजगाव ते छत्रपती संभाजीनगर अशा दोन टप्प्यांत केले जात आहे. या दोन्ही टप्प्यांसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, अंकाई–करंजगाव मार्गावरील ३० किलोमीटर अंतराचे सपाटीकरण पूर्ण झाले आहे. सध्या १० ठिकाणी पुलांचे बांधकामही सुरू आहे.
या प्रकल्पासाठी गंगापूर, वैजापूर व संभाजीनगर तालुक्यातील जमिनींचे संपादन सुरू असून, दक्षिण मध्य रेल्वे विभागाने शरणापूर, मिटमिटा, माळीवाडा, वंजारवाडी, लासूरगाव आदी गावांतील सुमारे ३५० शेतकऱ्यांकडून हरकती मागविल्या आहेत. ही प्रक्रिया जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
दुहेरीकरणामुळे रेल्वे मार्गाची वापर क्षमता सध्या असलेल्या ११५ टक्क्यांवरून १४३ टक्क्यांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. यामुळे मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, अमृतसर आणि निजामाबादसारख्या शहरांशी जोडणारे पर्यायी मार्ग उपलब्ध होतील. याचा ३८ गावांतील सुमारे ९८ लाख लोकसंख्येला थेट लाभ होणार आहे.
मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी सांगितले की, नियोजित गतीने काम झाले, तर हा प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होऊ शकतो. ठेकेदारांनी नियोजनबद्ध आणि वेगवान काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*