पंढरपूर : आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. विशेष म्हणजे या पूजेसाठी वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास दामू उगले आणि कल्पना उगले या दाम्पत्याला मानाचा वारकरी म्हणून पूजेचा बहुमान मिळाला. कैलास उगले हे शेती करत असून, गेले बारा वर्षे ते नियमितपणे आषाढी वारीसाठी पंढरपूरला येत आहेत.
महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण कल्याणासाठी विठ्ठल चरणी साकडे घातले. “महाराष्ट्राची काळजी घेण्याची शक्ती द्या, आम्हाला सन्मार्गाने चालण्याची सद्बुद्धी द्या, आणि बळीराजाला समाधान व आनंदाचे क्षण मिळू द्या,” असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले. या वेळी ग्रामविकास मंत्री आणि पंढरपूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेही उपस्थित होते.
दरम्यान, यंदाच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 18 लाख भाविक दाखल झाले असून, एकादशीच्या महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. दर्शनाची रांग गोपाळपूरच्या पलीकडे गेली असून, अनेक भाविक पवित्र चंद्रभागा नदीत स्नान करून दर्शनासाठी विठोबा मंदिरात दाखल होत आहेत. यंदा प्रथमच मुखदर्शनाची रांग तब्बल सहा ते सात किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.
पालकमंत्री गोरे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे दोघेही संपूर्ण वारीच्या व्यवस्थापनावर व्यक्तिगत लक्ष ठेवत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*