छत्रपती संभाजीनगरसह राज्यभर अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आल्याने सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा संपत असतानाही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीची संधी देण्यात आली असून, १९ ऑगस्ट दुपारी १ वाजल्यापासून ते २० ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे.
१५ ते १७ ऑगस्टदरम्यान विशेष फेरीसाठी नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती तसेच राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा (एटीकेटी) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आता १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता विशेष फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार जागा वाटपाची यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी १ वाजल्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल आणि २० ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ती सुरू राहणार आहे.
यापूर्वी ‘ओपन टू ऑल’ या फेरीअंतर्गत नवीन नोंदणी आणि अर्ज दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्ट होती. नंतर या मुदतीत वाढ करण्यात आली होती.
दरम्यान, काही कनिष्ठ महाविद्यालयांनी ५० टक्के प्रवेश पूर्ण केले आहेत. त्यामुळे अशा महाविद्यालयांना अकरावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही ठिकाणी वर्ग सुरू झाले असून, इतर ठिकाणी लवकरच सुरू होणार आहेत.
यंदाची पूर्णपणे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पहिल्यांदाच राबविली जात असल्याने तांत्रिक अडचणी आणि विलंब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये अजूनही संभ्रमाची स्थिती कायम आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*