छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा अनुक्रमे २० आणि १० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी मंडळाने व्यापक नियोजन सुरू केले असून यंदा केंद्रांवर कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले असून केंद्राबाहेर ड्रोनद्वारे देखील लक्ष ठेवले जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षित भिंती, जाळीदार खिडक्या आणि स्वच्छतागृह या सुविधा असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच केंद्र मान्यतेसाठी या सर्व अटींचे पालन आवश्यक असून सुविधा अपूर्ण असल्यास केंद्रास मान्यता मिळणार नाही.
माध्यमिक शिक्षण विभागाने घेतलेल्या बैठकीत परीक्षा केंद्रांवरील तपासणीचे फोटो बोर्डाला पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या छायाचित्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, भिंती व इतर सुविधा स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेदरम्यान करण्यात आलेले चित्रीकरण निकाल लागेपर्यंत सुरक्षित ठेवावे लागणार आहे.
मागील वर्षी काही केंद्रांवर सामूहिक कॉपीचे प्रकार आढळल्याने संबंधित केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली होती. यंदा अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या मदतीने ड्रोन चित्रीकरणासह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. फुलंब्री आणि वैजापूर येथील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर या वर्षी त्या केंद्रांचा संपूर्ण स्टाफ बदलण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली.
राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे की, परीक्षेदरम्यान गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्रावर कायदेशीर कारवाई होईल आणि त्यांची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाईल. विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला शाळांना देण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*