छत्रपती संभाजीनगर: शहरातील पाणीपुरवठ्यात पुन्हा एकदा अडथळा निर्माण झाला असून नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. गुरुवारी जायकवाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल पाच तास पाणीपुरवठा ठप्प होता. या तांत्रिक अडथळ्यामुळे संपूर्ण शहरावर परिणाम झाला असून नियोजित वेळेनुसार पाणी न मिळाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
गुरुवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होणार होता, त्यांना पाणी मिळाले नाही. परिणामी, शुक्रवारी ज्या भागांना पाणीपुरवठा होणार होता, त्यांना आता शनिवारी पाणी मिळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. उन्हाळ्यात मुबलक पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात 2500 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
याशिवाय, 900 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असले तरी जलशुद्धीकरण केंद्राचे काम रखडल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. एका कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे तब्बल 18 लाख नागरिकांना पाण्यासाठी झगडावे लागत आहे. वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने 30 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, सद्यस्थितीत हे काम वेळेत पूर्ण होईल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी परिस्थितीत सुधारणा होताना दिसत नाही. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिका आणि संबंधित विभागांनी त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*