छत्रपती संभाजीनगर : शहराजवळील ऐतिहासिक देवगिरी (दौलताबाद) किल्ल्याच्या परिसरात आज (मंगळवार) सकाळी आठच्या सुमारास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीमुळे किल्ल्याच्या सभोवतालचा मोठा परिसर जळून खाक झाला असून, जीवसृष्टीला आणि ऐतिहासिक वारशाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

खांदुर्णी आणि किल्ला परिसरात लागलेल्या आगीने काही वेळातच मोठं रूप धारण केलं. सुकलेल्या गवताने आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीचा फैलाव अधिक वेगाने झाला. किल्ल्यावर वास्तव्यास असलेले मोर, माकडं, लांडोर, इतर पक्षी व प्राणी घाबरून परिसरातील शेतांमध्ये धाव घेताना दिसले. अनेक लहान प्राणी आणि जीवजंतू आगीत जळून नष्ट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाला कळवण्यात आले. मात्र, किल्ल्याचा कठीण भूगोल आणि उंचसखल रचना यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना पोहोचण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे स्थानिकांनी झाडांच्या फांद्या, पाण्याचे हंडे अशा स्थानिक साधनांचा वापर करून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले.

दरवर्षी उन्हाळ्यात देवगिरी किल्ल्याला आग लागण्याच्या घटना घडतात. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने वारंवार अशी भीषण संकटं ओढावतात. इतिहास अभ्यासकांच्या मते, वारंवार लागणाऱ्या आगांमुळे किल्ल्यावरील पुरातन वास्तूंना धोका निर्माण झाला आहे. शासनाने वेळेवर उपाययोजना न केल्यास हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,949 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क