छत्रपती संभाजीनगर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे प्रचंड उष्णतेचा त्रास जाणवत आहे. विशेषतः वाहतूक सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनधारकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत असल्याने, नागरिकांकडून सिग्नल बंद ठेवण्याची मागणी होत होती.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २२ एप्रिल) पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेत दुपारी १२ ते ४ या वेळेत सर्व वाहतूक सिग्नल बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दुपारी ४ नंतर मात्र सर्व सिग्नल नियमितपणे रात्री ९.३० वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहेत. यासोबतच सिग्नल बंद असतानाही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिग्नलवरील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.
तसेच, दुपारच्या वेळेत कर्मचाऱ्यांना आळीपाळीने जेवणासाठी जाऊ देण्यात येईल, मात्र सिग्नलवर किमान एक कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आपापल्या हद्दीतील नियमित पॉइंट तपासून ड्युटीवर गैरहजर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
उष्णतेच्या झळा कमी करण्यासाठी पोलिस विभागाचा हा निर्णय नागरिकांसाठी एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*