छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. यामध्ये सिल्लोड, सोयगाव, वैजापूर व फुलंब्री तालुक्यांत विजेच्या धकक्याने सहा जनावरांचा मृत्यू झाला असून, आंबा व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
सिल्लोड शहरासह बोरगाव कासारी, गेवराई सेमी व निल्लोड मंडळात जोरदार पावसासह वादळी वाऱ्याचा अनुभव आला. बोरगाव कासारी व गेवराई सेमी येथे दोन ठिकाणी वीज कोसळून दोन जनावरे जागीच ठार झाली, तर एक बैल गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
सोयगाव तालुक्यातील वाकडी शिवारात विजेचा धक्का बसून दोन बैलांचा मृत्यू झाला. फुलंब्री तालुक्यातील मुर्शिदाबाद वाडी येथे शेतकरी निवृत्ती द्वारकानाथ विटेकर यांच्या शेतात वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात महसूल विभागाने पंचनामा करून अहवाल तयार केला आहे.
दरम्यान, वैजापूर तालुक्यातील खंडाळा शिवारात झालेल्या वादळी पावसात विजेचा फटका बसून एका खिल्लारी बैलाचा मृत्यू झाला आहे.
या अवकाळी पावसामुळे फळबागांनाही मोठा फटका बसला असून, आंब्याच्या झाडांवरील कोवळी फळे गळून पडली आहेत. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, शासनाकडून मदतीची मागणी केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*