छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडी परिसरात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीवरून शिवीगाळ झाल्याच्या कारणावरून संतापलेल्या तिघा जिवलग मित्रांनी एका मित्राला झाडावर जोरात आदळून त्याचा निघृण खून केल्याची घटना ३० जून रोजी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी सातारा पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयितांना अटक केली आहे.

मृत तरुणाचे नाव राजू किसन वंजारी (वय ३३, रा. गौतमनगर, कांचनवाडी) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी राजू वंजारी हा त्याचे मित्र सोनू गव्हाणे, युवराज गायकवाड आणि पांडुरंग गायकवाड यांच्यासोबत परिसरातील एका झाडाखाली बसून मद्यपान करत होता. मद्यधुंद अवस्थेत असताना पत्नीवरून शिवीगाळ झाली आणि त्यातून वाद चिघळला. संतापाच्या भरात तिघांनी मिळून राजूला झाडावर जोरात आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या मारहाणीत त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेनंतर मुख्य आरोपी सोनू गव्हाणे याने मृतदेह मोटारसायकलवर बसवून थेट राजूच्या गौतमनगर येथील घरी नेला. मृतदेह घरासमोर सोडून तो दुसऱ्या मित्रासह तेथून पसार झाला. राजूचे वडील किसन वंजारी यांनी मुलाची नाडी व श्वास तपासला असता तो मृत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याला तातडीने घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक शैलेश देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी रात्रीतच तिन्ही संशयितांना ताब्यात घेत अटक केली. न्यायालयाने आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, राजू वंजारी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आई-वडील आणि भाऊ असा परिवार असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,060 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क