छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ महाराज यांच्या आषाढी वारीतील पायी दिंडी सोहळा यंदा आगळावेगळा ठरणार आहे. यंदापासून नाथपादुकांची पालखी चक्क चांदीच्या भव्य रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. १२० किलो चांदी आणि उच्च दर्जाच्या सागवानी लाकडाचा वापर करून या ऐतिहासिक रथाची भव्य निर्मिती केली जात आहे.

नाथपंथीय भक्तांच्या सहभागातून हा चांदीचा रथ तयार केला जात असून, दिंडी प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले आणि योगेश पालखीवाले यांनी नाथभक्तांना या रथनिर्मितीत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. लोकवर्गणीच्या माध्यमातून रथनिर्मितीचा पुढील टप्पा पूर्ण करण्यासाठी भक्तांनी पुढे यावे, असे त्यांनी म्हटले आहे.

ही पालखी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दाखल होणार असून, नाथपंथीय भक्तांसाठी ही अभिमानाची बाब आहे. एकनाथ महाराजांनी समाजप्रबोधन, संतपरंपरा आणि भक्तीचा जो दीप पेटवला, त्याचे प्रतीक म्हणजे ही पालखी. त्यामुळे या पालखीची मिरवणूक अधिक भव्य व भक्तिपूर्ण करण्यासाठी सज्जता सुरू आहे.

रथाच्या सजावटीसाठी पारंपरिक कोरीव काम, चांदीची नक्षी, नाथसंप्रदायाचे प्रतीकचिन्ह यांचा समावेश करण्यात येणार आहे. रथ सध्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो भक्तांच्या दर्शनासाठी सादर होणार आहे.

ही ऐतिहासिक दिंडी आणि चांदीचा रथ नाथपंथाच्या वारशाचे जतन करणारा आणि भक्तीचा नवसंवाद निर्माण करणारा ठरणार आहे, असा विश्वास नाथभक्तांनी व्यक्त केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

563 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क