अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुरू केलेले उपोषण अखेर सातव्या दिवशी मागे घेतले. गेल्या सात दिवसांपासून अमरावतीत उपोषण सुरू होते. त्यानंतर अखेर राज्य सरकारकडून सकारात्मक आश्वासने मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी उपोषण मागे घेतले, मात्र त्याचवेळी सरकारला २ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे.
शुक्रवारी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट फोनवरून संवाद साधण्यात आला. फडणवीस यांनी कर्जमाफीसंदर्भात एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल आणि त्यात बच्चू कडू यांचा समावेश असेल, असे आश्वासन दिले. मात्र, समिती कधी नेमणार याची निश्चितता नसल्यामुळे कडू उपोषणावर ठाम होते.
शनिवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यांनी सरकारकडून अधिकृत पत्र घेऊन येत, येत्या १५ दिवसांत उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल आणि अहवालानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर कडू यांनी उपोषण मागे घेतले.
मात्र उपोषण मागे घेतानाही त्यांनी सरकारला इशारा दिला – “२ ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात निर्णयाची तारीख जाहीर झाली नाही, तर आम्ही थेट मंत्रालयात घुसू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
बच्चू कडू म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी याआधी मौन धारण केले होते, पण आता कर्जमाफीवर बोलायला लागले आहेत. ९० टक्के मागण्या मान्य झाल्या असून दिव्यांगांच्या २० मागण्यांनाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.”
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*