देशातील दुचाकी चालकांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 1 जानेवारी 2026 पासून देशात विक्री होणाऱ्या सर्व दुचाकींमध्ये एबीएस (Anti-lock Braking System) अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वाहनांच्या ब्रेकिंग क्षमतेत सुधारणा होईल आणि अपघातांची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.
यापूर्वी फक्त 125 सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या वाहनांमध्येच ABS सक्तीचे होते. मात्र आता सर्व श्रेणीतील दुचाकी वाहनांमध्ये हा नियम लागू होणार आहे. एबीएसमुळे आपत्कालीन ब्रेक लावतानाही चाकं लॉक न होता वाहनावर ताबा राखता येतो, ज्यामुळे अपघात टळण्याची शक्यता वाढते.
या निर्णयासोबतच मंत्रालयाने आणखी एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. यानुसार, प्रत्येक नव्या दुचाकी वाहनासोबत दोन BIS प्रमाणित हेल्मेट्स देणे बंधनकारक असेल – एक चालकासाठी व एक मागे बसणाऱ्या प्रवाशासाठी. अपघातांमध्ये हेल्मेटचा अभाव ही गंभीर जखमांची मोठी कारणीभूत ठरते. म्हणूनच या निर्णयाचे स्वागत होत आहे.
तज्ञांच्या मते, या उपायांमुळे दुचाकी अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात ३० ते ४० टक्क्यांनी घट होऊ शकते. मात्र काही ग्राहक आणि विक्रेते यामुळे वाहनांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.
तरीही, रस्ते सुरक्षा आणि नागरिकांचे प्राण वाचवणे हा सरकारचा उद्देश असल्यामुळे या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. मंत्रालय लवकरच यासंबंधी अंतिम अधिसूचना जारी करणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*