पैठण : राज्यातील सर्वात मोठ्या जलसाठ्यांपैकी एक असलेल्या जायकवाडी धरणाच्या सुरक्षेसाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ११५ सीसीटीव्ही कॅमेरे आणि ५ वॉच टॉवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणावर संभाव्य धोके आणि वाढती सुरक्षा गरज लक्षात घेता, हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.
सुमारे ६ महिन्यांपूर्वी पोलिसांकडून धरणाचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले होते. या तपासणीत काही सुरक्षासंवेदनशील बाबी अधोरेखित करण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी जलसंपदा विभागाला गोपनीय अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने ‘ड्रीप’ (धरण दुरुस्ती प्रकल्प) योजनेंतर्गत सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
जायकवाडी धरणाची भिंत तब्बल १० किलोमीटर लांबीची असून, तिचे संरक्षण करणे हे मोठे आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ड्रीप योजनेंतर्गत ₹९३ कोटी ९८ लाखांचा निधी धरणाच्या विविध दुरुस्ती कामांसाठी मंजूर केला आहे. या निधीमधून सध्या काही कामे सुरू आहेत तर काही कामे निविदा प्रक्रियेत आहेत.
या सुरक्षेच्या नव्या आराखड्यासाठी ₹४.५ कोटींचा स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतूनच ६६ हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे आणि ५ वॉच टॉवर उभारले जातील, अशी माहिती समाधान सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा विभाग यांनी दिली.
या उपाययोजनांमुळे जायकवाडी धरणाची सुरक्षा अधिक बळकट होणार असून, कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*