छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगाम २०२४ अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ऑनलाइन अर्ज भरले नाहीत, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या पत्रानुसार, तांत्रिक अडचणींमुळे अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना दिनांक ३ जुलै ते ५ जुलै २०२४ दरम्यान शेवटची संधी देण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार, यंदाच्या खरीप हंगामात ज्वारी, मका, तूर, उडीद, मूग, सोयाबीन, भात आणि कापूस या पिकांसाठी विमा संरक्षण देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना www.pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरावा लागतो. परंतु, अनेक शेतकरी ई-पीक पाहणीसाठी पोर्टलवर वेळेवर नोंदणी करू शकले नाहीत किंवा तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा अर्ज प्रलंबित राहिला.
ही बाब लक्षात घेऊन शासनाने ३ दिवसांची मुदतवाढ दिली असून, ज्या शेतकऱ्यांचे ई-पीक पाहणी संलग्न आहे पण विमा अर्ज अपूर्ण आहे, त्यांना ३ जुलै ते ५ जुलै दरम्यान अर्ज भरण्याची अंतिम संधी आहे. या कालावधीत कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवू नये, यासाठी जिल्हा कृषी विभागाने सर्व संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पंचायत समिती व महसूल प्रशासनाला या मुदतीत अर्ज प्रक्रियेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांनी ही अंतिम संधी न गमावता त्वरित अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*