छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गावर लोखंडी कैची आणि त्यावर पत्रे बसवण्याचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या वतीने होणाऱ्या या कामामुळे २६ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत हा भुयारी मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात सातारा, देवळाई परिसरासह या मार्गालगत असलेल्या गावांतील नागरिकांना मोठा फेरा मारावा लागणार आहे.
दररोज दीड ते दोन लाख नागरिक या भुयारी मार्गाचा वापर करतात. मात्र दुरुस्तीच्या कारणामुळे त्यांना ५ किलोमीटरहून अधिकचा फेरा मारावा लागेल. यामुळे नागरिकांच्या वेळ आणि इंधनाचा मोठा खर्च वाढणार आहे. वाहतुकीतील अडचणी टाळण्यासाठी वाहतूक पोलिस दल आणि प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
पर्यायी मार्ग
देवळाई चौक-गोदावरी टी मार्गे-संग्रामनगर उड्डाणपुलावरून ये-जा करता येईल. तसेच देवळाई चौक-गोदावरी टी-एमआयटी कॉलेज- महानुभाव आश्रम चौक-रेल्वे स्टेशनमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. या मार्गांचा वापर करून वाहनचालकांनी आपली वाहतूक सुलभ करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कामकाजाच्या काळात पोलिस विभागाकडून वाहतूक नियोजनासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती अधिकाऱ्यांनी केली आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना सुरक्षित आणि सुधारित भुयारी मार्गाचा लाभ होणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*