छत्रपती संभाजीनगर : “ग्राहकाला आपण दैवत मानतो, आणि या दैवताचा नैवेद्य शुद्ध, सकस व भेसळमुक्त असावा,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हॉटेल व अन्न व्यावसायिकांना करताना केले. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षेचा’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील हॉटेल्स व अन्न व्यावसायिकांची बैठक व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन द.वि. पाटील, सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी प्र.प. सुरसे, सु.त्रि. जाधवर, वर्षा रोडे, एस.बी. तायडे, मो. फ. सिद्दीकी, पी.एस. अंजिठेकर तसेच शहरातील हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, सणासुदीच्या काळात मिठाई, फरसाण, सुका मेवा यांची विक्री वाढते, ज्यामुळे भेसळीची शक्यता वाढते. अशावेळी घातक घटकांनी युक्त अन्नामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. यात मिठाई व इतर अन्नपदार्थ तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या ठिकाणांची तपासणी केली जाईल. दुध, खवा, मावा, तूप, साखर, मैदा यांसारख्या घटकांची शुद्धता तपासली जाईल.
पी.एस. अंजिठेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मिठाईतील घटक भेसळयुक्त आहेत की नाहीत, याची काटेकोर तपासणी केली जाईल.
प्रशिक्षण सत्रात अन्न सुरक्षा नियम, स्वयंपाकघरातील स्वच्छता, किटक प्रतिबंध, तसेच अस्वच्छ सवयी टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी हॉटेल व अन्न व्यावसायिकांना अल्प नफ्यासाठी भेसळीचा मार्ग न स्वीकारता ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*