छत्रपती संभाजीनगर : शहरात आज मंगळवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण दौरा नियोजित होता. या दौऱ्यात शहराच्या २६ एमएलडी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन तसेच ‘वारसा सह्याद्रीचा’ या कार्यक्रमाच्या समारोपासाठी उपस्थित राहण्याचा त्यांचा कार्यक्रम होता. मात्र, हा दौरा अखेर रद्द करण्यात आला आहे.
दौरा रद्द होण्यामागील प्राथमिक कारण मुंबईतील संततधार पाऊस असल्याचे समजते. मुसळधार पावसामुळे विमान वाहतूक प्रभावित झाली असून मुख्यमंत्र्यांच्या विमानाला उड्डाण घेण्यात अडचणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नियोजित दौरा रद्द केला आहे.
याअंतर्गत आज सायंकाळी ५.४० वाजता फारोळा येथे होणारे पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन तसेच रात्री एमआयटीच्या मंथन हॉलमध्ये होणारा समारोप कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीशिवाय पार पडण्याची शक्यता आहे किंवा पुढील तारखेला आयोजित केला जाऊ शकतो.
दरम्यान, शहरात कावड यात्रेचे आयोजन पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहणार असून या संदर्भात वाहतूक बदल लागूच राहतील. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहनधारकांनी वाहतूक बंदिस्त मार्गांचा वापर टाळावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*