छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात यात्रा भरते. या यात्रेला तसेच विजयादशमीच्या दिवशी बालाजी भगवानांच्या रथयात्रेला परिसरातीलच नव्हे तर जिल्हाभरातून आणि बाहेरील भागातूनही हजारो भाविक हजेरी लावतात. भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे वाहतुकीवर ताण येतो. त्यामुळे यंदा पोलिस प्रशासनाने विशेष वाहतूक नियोजन केले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक सचिन मिरधे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी चौक परिसरात वाढत्या गर्दीचा विचार करून २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
वाहतूक व्यवस्थेत रेल्वे स्टेशनकडून मध्यवर्ती बसस्थानक, छावणी आणि पडेगावकडे जाणारी सर्व वाहने बाबा पेट्रोल पंप चौकातील उड्डाणपुलाचा वापर करतील. तसेच नाशिक व धुळेकडून बीड, जालन्याकडे जाणाऱ्या वाहनांना शरणापूर फाटा, साजापूर फाटा, एएस क्लब, लिंक रोडमार्गे महानूभव आश्रम चौक, बीड बायपास असा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. कोकणवाडी चौकाकडून पंचवटीकडे येणारी वाहने रेल्वे स्टेशन किंवा क्रांती चौक मार्गे वळवली जाणार आहेत.
दरम्यान, वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेले मार्ग असे आहेत – लोखंडी पूल ते पंचवटी चौक, महावीर चौक ते उड्डाणपुलाखालील मार्ग, कोकणवाडी चौक ते पंचवटी मार्ग तसेच रेल्वे स्टेशनकडून पंचवटीकडे जाणारे मार्ग.
पोलिस प्रशासनाने भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून बंदोबस्ताची विशेष व्यवस्था केली आहे. नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचना पाळाव्यात आणि पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*