मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या असून, शेती, घरे, जनावरे व व्यवसाय यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांवरही मोठे संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २५ सप्टेंबर रोजी पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे दिवसभरात पाच जिल्ह्यांतील सर्वाधिक प्रभावित गावांना भेट देणार आहेत. सकाळी ११.३० वाजता ते लातूर जिल्ह्यातील काडगावला भेट देतील. त्यानंतर १२.३० वाजता धाराशिव जिल्ह्यातील इटकूर येथे ते पोहोचणार आहेत. दुपारी १.३० वाजता पारगावातील नुकसानीची पाहणी करून ते थेट बीड जिल्ह्यातील कुर्ला गावाकडे रवाना होतील, जिथे ते ३.३० वाजता हजेरी लावतील. त्यानंतर ४.३० वाजता जालना जिल्ह्यातील महाकाळा येथे ते नुकसानग्रस्तांना भेटतील. संध्याकाळी ५.३० वाजता ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रजापूर गावाला भेट देऊन दौऱ्याची सांगता करतील.
राज्यातील मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव या जिल्ह्यांत गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले, तर काही ठिकाणी पूल तुटल्याने संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनावरांचेही जीवितहानीच्या घटना समोर येत आहेत.
पूरस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना आधार देण्याबरोबरच राज्य सरकारने तातडीने मदतकार्य सुरू करावे, अशी मागणीही उद्धव ठाकरे करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या दौऱ्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळणार असून, आगामी काळात मदतकार्याची गती वाढण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*