छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पूरस्थिती गंभीर झाली असून जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी (२९ सप्टेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या आदेशातून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळा वगळण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी रविवारी संध्याकाळी हा आदेश काढला.
हवामान खात्याने जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही तासांतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. शेतशिवार पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसानही वाढले आहे. शहरातही सिडको, उस्मानपूरा, गुलमोहोर कॉलनी, शाहगंज अशा भागांत पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत.
दरम्यान, छोटे-मोठे प्रकल्प ओसंडून वाहू लागले असून विसर्ग सुरू आहे. वाढलेले पाणी लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत, तसेच धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची तयारी केली आहे.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, पावसाचा जोर लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.
अचानक वाढलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी मिळाली असली तरी ग्रामीण भागातील अडचणी कायम आहेत. पूरस्थिती लक्षात घेता प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था सज्ज असून मदत कार्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा तयार ठेवल्या आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*