छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने एक शेतकरी हतबल झाला व त्याने टोकाचे पाऊल उचलले. बकापूर-पळशी गावातील मधुकर सर्जेराव पळसकर या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात दुःखाची लाट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर पळसकर यांनी मोठ्या कष्टाने त्यांच्या शेतात कोबीची लागवड केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पीक पाण्याखाली बुडाले. हातात तोंडाशी आलेला धान्याचा तुकडा निसर्गाने हिरावून घेतल्याने मधुकर अत्यंत हतबल झाले. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा ताण असून हैदराबादमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या लेकीची फी भरायची होती. या आर्थिक आणि मानसिक ताणातून त्यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
मधुकर यांच्या आत्महत्येने पळसकर कुटुंबावर मोठा धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली आणि एक मुलगा आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गमावल्याने घरात दुःखाचे वातावरण पसरले आहे. शेजारी व गावकऱ्यांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले असून, अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. ही घटना शेतीत वाढत चाललेल्या संकटाची आणि शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावरील परिणामाची दखल घेण्यास भाग पाडते.
परिसरातील लोकांनी शेतकऱ्यांच्या संकटावर लक्ष देण्याची आणि त्यांना योग्य मदत पोहोचवण्याची गरज आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*