छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने एकाच वेळी तीन महत्त्वाच्या पदांवर बदल्या करत जिल्ह्याच्या प्रशासनात मोठी हालचाल घडवून आणली आहे. जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या तिन्ही प्रमुख पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने प्रशासनाला नव्या ऊर्जेची दिशा मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.

महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अमोल येडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. विद्यमान आयुक्त जी. श्रीकांत यांची बदली करून त्यांना नवी मुंबई येथे ‘जल जीवन मिशन’च्या संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शहरातील प्रलंबित प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या कामांना आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी पदावरही बदल करण्यात येत दिलीप स्वामी यांच्या जागी विनय गौडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या कारभारात नवीन दृष्टिकोन आणि नियोजनशैली पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तसेच, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मिन्नु पी.एम. यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी अंकित यांची जागा घेतली आहे. ग्रामीण विकासाच्या योजनांमध्ये गती आणि कार्यक्षमतेवर भर दिला जाणार असल्याचे संकेत आहेत.

एकाच वेळी तिन्ही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रशासनात ‘ट्रिपल बदल’ झाल्याचे चित्र आहे. या बदलांचा थेट परिणाम शहर आणि ग्रामीण भागातील विकासकामांवर होणार असून नागरिकांचे लक्ष आता नव्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीकडे लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,918 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क