छत्रपती संभाजीनगर : खेळता-खेळता तोंडात गेलेला बदाम, शेंगदाणा आणि चिंचोका तीन चिमुकल्यांच्या जीवावर बेतला होता. मात्र घाटी रुग्णालयातील ईएनटी आणि बालरोग विभागाच्या सतर्कतेमुळे अवघ्या तीन दिवसांत तीन बालकांना नवजीवन मिळाले. वेळेवर केलेल्या शस्त्रक्रियेमुळे मोठा अनर्थ टळला असून, कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
दोन वर्षीय आयान सय्यद याने खेळताना बदाम गिळल्यामुळे त्याला खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि आवाजात बदल जाणवू लागला. तातडीने घाटीत दाखल केल्यानंतर बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे-मोरे यांनी त्याला ईएनटी विभागाकडे पाठविले. विभागप्रमुख डॉ. सुनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ब्रॉन्कोस्कोपीद्वारे श्वसनमार्गात अडकलेला बदाम यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला.
याच काळात गायत्री बोराडे या चिमुरडीच्या फुफ्फुसात शेंगदाणा अडकल्याने तिची प्रकृती गंभीर झाली होती. तर आठ वर्षीय सई काकडे हिने चिंचोका गिळल्यामुळे तिला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली होती. दोघींवरही तातडीने मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करून त्यांना धोक्यातून बाहेर काढण्यात आले.
अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुचिता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ईएनटी व बालरोग विभागातील डॉक्टर, भूलतज्ज्ञ आणि परिचारिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाली.
दरम्यान, लहान मुलांच्या हातात सुका मेवा, शेंगदाणे किंवा लहान वस्तू देताना विशेष खबरदारी घ्यावी, अन्यथा क्षणिक दुर्लक्ष जीवघेणे ठरू शकते, असा इशारा डॉक्टरांनी पालकांना दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*