छत्रपती संभाजीनगर : श्रावण महिन्यानिमित्त वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर आणि खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील जड वाहनांची वाहतूक १३ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असून, ही वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहेत.
यंदा १३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत श्रावणमास साजरा होत आहे. या काळात दर शनिवारी खुलताबाद, तर दर सोमवारी वेरूळ येथे राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. विशेषतः ३१ ऑगस्ट रोजी तिसऱ्या श्रावण सोमवारी वेरूळ येथील तीर्थकुंडातून कावडीने पाणी नेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने पायी प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावरील जड वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे.
- कन्नडकडून वेरूळ-खुलताबाद-दौलताबादमार्गे ये-जा करणारी जड वाहने आता छत्रपती संभाजीनगर–शरणापूर फाटा–माळीवाडा-कसाबखेडा फाटा या मार्गाने कन्नडकडे जातील.
- फुलंब्रीहून खुलताबाद-वेरूळ-कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगरला येऊन शरणापूर फाटामार्गे पुढे जातील.
- तर वैजापूरकडून वेरूळ-खुलताबादमार्गे फुलंब्रीकडे जाणारी वाहने वैजापूर–शिवूर–पाचपीरवाडी–शरणापूर–छत्रपती संभाजीनगर मार्गे फुलंब्रीकडे वळविण्यात येणार आहेत.
भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहनधारकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करून निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*