छत्रपती संभाजीनगर : शहरात १४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली तिरंगा यात्रा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निघणाऱ्या या तिरंगा यात्रेला मोठ्या संख्येने नागरिक, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात येणार आहे.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी विशेष अधिसूचनेद्वारे दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपासून तिरंगा यात्रा आणि कार्यक्रम संपेपर्यंत क्रांती चौक ते गोपाल टी हा प्रमुख मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
या काळात वाहनचालकांनी बंद मार्गाचा वापर न करता पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
क्रांती चौक परिसरातील वाहतूक सिल्लेखाना चौक आणि कार्तिकी चौक मार्गे वळवण्यात येणार आहे. तसेच काही वाहतूक क्रांती चौक उड्डाणपुलावरून चुन्नीलाल पेट्रोल पंप मार्गे पुढे सोडण्यात येईल.
पंचवटी चौक ते गोपाल टी या मार्गावरील वाहने पंचवटी चौक-कॊकणवाडी मार्गे गोपाल टीकडे ये-जा करू शकतील. तर सेशन कोर्ट ते गोपाल टी या मार्गावरील वाहतूक कोकणवाडी चौक मार्गे वळवण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा, तिरंगा यात्रेतील नागरिकांची मोठी गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा वाहतूक बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*