गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : सिडको वाळुजमहानगर परिसरातील नागरिकांना मागील १५ दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होत चालला असून, रहिवाशांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. नियमित पाणीपुरवठ्याची मागणी करत सिडको वाळुज महानगर बचाव कृती समितीने सिडकोचे मुख्य प्रशासक भागवत भिगोद यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांनी प्रशासनाला ठाम शब्दांत इशारा दिला की, “जर हा प्रश्न तातडीने सोडवला गेला नाही, तर मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडले जाईल.” वाळुजमहानगर प्रकल्प अंतर्गत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. अनेक भागांत आठवड्यातून फक्त एकदाच पाणीपुरवठा होतो, तोही अपुरा आणि कमी दाबाने. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, यामुळे आर्थिक भार वाढला आहे.
पाणीपुरवठ्याची मागणी
सिडको प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, नियमित पुरवठ्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि कायमस्वरूपी सोडवणुकीसाठी नियोजन करावे, अशी मागणी कृती समितीने केली आहे.
सिडको प्रशासक भागवत भिगोद यांनी निवेदन स्वीकारले असून, लवकरच या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे.
जर प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, तर संपूर्ण वाळुजमहानगर वाशीयांसोबत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा निर्धार नागेश कुठारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला. आता प्रशासन यावर किती तातडीने कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*