छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून जिल्ह्यात बोगस बियाणे व खतांचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात थेट कारवाई करण्यासाठी विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
प्रत्येक खरीप हंगामात शेतकऱ्यांना नकली बियाणे व खते विकून मोठी फसवणूक केली जाते. अनेक वेळा परवानाधारक दुकानदार शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे व खते देण्यासाठी इतर अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक्ती करतात. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
या पार्श्वभूमीवर प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक जिल्हास्तरीय व नऊ तालुकास्तरीय भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्हा परिषद कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्हास्तरीय पथकात उपविभागीय कृषी अधिकारी, पी. ए. ताजने (जिप मोहीम अधिकारी), एस. वाय. मुंढे (वैध मापन शास्त्र उपनियंत्रक) व एच. एस. कातोरे (गुणवत्ता निरीक्षक) यांचा समावेश आहे.
तालुकास्तरावरही कृषी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात पाच अधिकाऱ्यांचे पथक असून तालुका कृषी अधिकारी हे प्रमुख आहेत.
शेतकऱ्यांनी जर बोगस बियाणे किंवा खते विक्रीबाबतची माहिती मिळाल्यास तत्काळ भरारी पथकाशी संपर्क साधावा किंवा कृषी विभागाकडे लेखी तक्रार द्यावी, असे आवाहन कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*