मुंबई : राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक बिघाडानंतर अखेर शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. आता २६ मेपासून ३ जूनपर्यंत विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज तसेच महाविद्यालयांच्या पसंतीक्रमांची नोंद करू शकतील.
राज्यात यंदा सर्व भागांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीत पद्धतीने राबविण्यात येत आहे. यासाठी शिक्षण विभागाने याआधीच वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. मात्र, २१ मेपासून सुरू होणाऱ्या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे अर्ज प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने गुरुवारी (२३ मे) दुपारी सुधारित वेळापत्रक जाहीर केले. या नव्या वेळापत्रकानुसार, आता विद्यार्थी २६ मे ते ३ जून दरम्यान नोंदणी अर्ज आणि प्राधान्यक्रम भरू शकतील. विद्यार्थ्यांना किमान १ आणि कमाल १० पर्याय देता येणार आहेत.
विशेष म्हणजे व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा आणि अल्पसंख्याक कोटासाठी शून्य फेरीचे अर्ज देखील याच कालावधीत भरता येणार आहेत. दरम्यान, ५ जून रोजी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाचे पालन करून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*