छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत सहकारी संस्था या सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणाऱ्या असाव्यात. मतभेद बाजूला ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा मिळाव्यात, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज येथे केले.
येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित आंबा मिलेट महोत्सव २०२५ चे उद्घाटन आज राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार अनुराधा चव्हाण यांचीही विशेष उपस्थिती होती.
शेतकऱ्यांसाठी नेहमीच सहकार्य राहील – पालकमंत्री शिरसाट
शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य उल्लेखनीय असून, त्यांना विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात शासनाचा कायमच सहभाग राहील, असे आश्वासन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले.
राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, एकदा चांगल्या कामाची सुरुवात झाली की लोकांचा विश्वास मिळतो. सहकार्याने काम केल्यास संस्थांची विश्वासार्हता वाढते.
महोत्सवाच्या उद्घाटनानंतर बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपाचे लोकार्पण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या महोत्सवात आंबा उत्पादक, धान्य उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट यांनी स्टॉल्स लावले होते. महोत्सव पाच दिवस चालणार असून ग्राहकांसाठी विविध उत्पादने येथे उपलब्ध असणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती डॉ. राधाकिसन पठाडे यांनी केले. यावेळी संचालक रामुकाका शेळके, भगावन मुळे, मुरलीधर चौधरी, व्यवस्थापक नितीन पाटील, विभागीय सह. निबंधक शरद दरे, एच पी कंपनीचे अजय सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*