१ जुलै २०२५ पासून देशभरात अनेक नियम आणि दरवाढ लागू होणार असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. सर्वप्रथम रेल्वे प्रवास महागणार आहे. भारतीय रेल्वेने मेल, एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी आणि दूरांतो गाड्यांसाठी तिकीटदरात वाढ जाहीर केली आहे. नॉन-एसी कोचसाठी प्रति किलोमीटर १ पैसा, तर एसी कोचसाठी २ पैसे दरवाढ होणार आहे. विशेष म्हणजे, तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार लिंक आणि OTP पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे, ज्यामुळे दलालांवर लगाम बसेल.
दिल्लीमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी १० वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहने आणि १५ वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहने आता पेट्रोल पंपावर इंधन भरण्यास पात्र राहणार नाहीत. यासाठी ANPR कॅमेरे लावण्यात येणार असून, नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. बंगळुरूतील एलिवेटेड हायवे टोल दरातही वाढ होणार असून, कारसाठी ₹६५, परतीच्या प्रवासासाठी ₹९५ आणि मासिक पास ₹१८८५ इतका खर्च येईल.
वीज दर वाढीचाही फटका बसणार आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे २.३६ टक्के इंधन समायोजन शुल्क आकारले जाणार असून, तामिळनाडूमध्ये सरासरी ३.१६ टक्के दरवाढ अपेक्षित आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांचे बिल सरासरी ₹३० ते ₹५० ने वाढेल.
दुसरीकडे, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे १ जुलैपासून महागाई भत्ता (DA) वाढणार आहे. सध्याचा ५५% DA ५८% पर्यंत जाण्याची शक्यता असून, याचा फायदा सुमारे १.२ कोटी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होणार आहे.
या सर्व बदलांमुळे जुलै महिन्याची सुरुवात नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या थोडी आव्हानात्मक असणार आहे, पण योग्य नियोजन केल्यास तो सामना करता येईल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*