छत्रपती संभाजीनगर : विट्स हॉटेलच्या वादग्रस्त लिलाव प्रकरणावरून राज्याच्या विधान परिषदेचे वातावरण सोमवारी चांगलेच तापले. या लिलावात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने बाजारभावाच्या तुलनेत कमी किंमतीत हॉटेल विकत घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे विधान परिषदेत जाहीर केले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात जोरदार आरोप करत सांगितले की, शिरसाट यांच्या मुलाची कंपनी टेंडर प्रक्रियेच्या काळात नोंदणीकृत नव्हती, तरीही नियम डावलून बोली लावण्यात आली. याशिवाय, त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचाही आरोप केला. दानवे यांनी या संपूर्ण प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली.
प्रकरण चिघळल्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हस्तक्षेप करत स्पष्ट केले की, संपूर्ण प्रक्रिया आता रद्द करण्यात आली असून पारदर्शकतेसाठी नवीन टेंडर काढले जाईल. यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनीही प्रतिपादन करत विरोधकांवर निशाणा साधला. “दलाली करण्यापेक्षा ऐकून घ्या,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली. मात्र, त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत गोंधळ घातला.
शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, लिलाव प्रक्रियेत काही अटी-शर्तींच्या बाबतीत अनियमितता झाली का, याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. तसेच, नवीन टेंडर प्रक्रिया पारदर्शकतेने होईल, याची हमी देण्यात येईल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*