छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर येथील भुयारी मार्गावरील छत उभारणीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने आता रात्रीच्या वेळेस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पावसाचे पाणी साचू नये म्हणून २६ जुलैपासून भुयारी मार्गाच्या दुतर्फा पोल उभारून त्यावर लोखंडी सांगाडा (केच्या) बसविण्याचे व त्यावर पत्रे टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीला ३१ जुलैपर्यंत काम पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला होता, मात्र सहा दिवस उलटूनही केवळ सांगाडा उभारण्यात आला आहे.
काम रखडल्यामुळे आता पत्रे बसविण्याचे काम रात्रीच्या वेळेस हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी रोज रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत शिवाजीनगर भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यासंदर्भातील बॅनरही या मार्गावर लावण्यात आले असून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या शटडाऊनमुळे विशेषतः रात्री व पहाटे ये-जा करणाऱ्यांचे हाल होणार आहेत. सातारा, देवळाई भागाकडे जाणाऱ्या नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांना आता शहानूरमियाँ दर्गा चौकमार्गे संग्रामनगर उड्डाणपुलाचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. दिवसा मार्ग मोकळा असला तरी रात्री वाहतूक बंद असल्यामुळे प्रवाशांना फटका बसणार आहे.
वाहनधारकांनी रस्ता बंद असल्याच्या वेळेत प्रवासाचे नियोजन करावे, अन्यथा अचानक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, प्रशासनाकडून अधिक नियोजनबद्ध कामाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*