छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने जाणारी रॅली निघणार आहे. या रॅलीत शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनांसह लाखो समाज बांधवांचा सहभाग अपेक्षित आहे. त्यामुळे पैठण व परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ग्रामीण पोलिसांनी मोठा वाहतूक बदल लागू केला आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅलीदरम्यान २७ व २८ ऑगस्ट रोजी विशेष वाहतूक योजना राबवली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर-बिडकीन-पैठण-शेवगाव या मार्गावरील वाहतूक वाळूज-गंगापूर-नेवासा-शेवगाव या मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच शेवगाव-पैठण-बिडकीन-छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने नेवासा-गंगापूर-वाळूज मार्गे प्रवास करतील.
याशिवाय, शहागड-हिरडपुरी-तुळजापूर-नवगाव-पैठण या मार्गावरील वाहतूक डोंगरगाव-पाचोड-पैठण या पर्यायी मार्गाने जाणार आहे. पैठण-नवगाव-तुळजापूर-हिरडपुरी-शहागड या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना पाचोडमार्गे डोंगरगाव-शहागड या मार्गे प्रवास करण्याचे निर्देश दिले आहेत.
रॅलीदरम्यान मोठी गर्दी अपेक्षित असल्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि बदललेल्या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, पोलीस प्रशासन वाहतूक व्यवस्थेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे.
रॅलीदरम्यान कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी किंवा अडचण होऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळणार असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*