छत्रपती संभाजीनगर : शहरातील जिन्सी परिसरात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांच्या दामिनी पथकाला यश आले. शुक्रवारी रात्री रोशनगेट भागातील एका मंगल कार्यालयात सुमारे ३०० उपस्थित पाहुण्यांसमोर सुरू असलेले विवाह समारंभ अचानक पोलिसांच्या कारवाईमुळे थांबवण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार, १६ वर्षीय सुहाना (नाव बदललेले) दहावीत शिक्षण घेत असून तिचे वडील इलेक्ट्रिशियनचे काम करून उदरनिर्वाह करतात. आर्थिक अडचणीमुळे कुटुंब मुलीचे शिक्षण पुढे न नेता, आर्थिकदृष्ट्या सधन कुटुंबातील १९ ते २० वर्षांच्या मुलाशी विवाह लावण्याच्या तयारीत होते. मुलीची संमती न घेता कुटुंबाने थेट विवाहाची तारीख आणि व्यवस्था निश्चित केली होती.
५ डिसेंबर रोजी वऱ्हाडी जमू लागले होते. भोजनाची व्यवस्था सुरू होती आणि विवाह सोहळा संपन्न होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांना या बालविवाहाची माहिती मिळाली. तत्काळ दामिनी पथकातील पोलिस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे, अंबिका दारुंटे, अमृता भोपळे, उषा सोनवणे, सोनाली निकम, सरिता कुंडारे आणि सुधाकर पवार यांनी धाव घेत कारवाई केली.
पोलिस कार्यालयात दाखल होताच उपस्थित पाहुण्यांमध्ये गोंधळ उडाला. अनेकांनी जेवण सोडून बाहेर पळ काढली. तर नातेवाईकांनी नवऱ्यामुलालाही रात्रीतच पसार केले.
पोलिस आणि बालकल्याण समिती सदस्य नितेश दुर्वे यांनी मुलगी आणि मुलाच्या नातेवाईकांकडे जन्मतारखेचे पुरावे व आधारकार्ड मागितले असता त्यांनी ती माहिती देण्यास नकार दिला. अखेर संबंधितांना सर्व कागदपत्रांसह बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या घटनामुळे शहरात बालविवाहासंदर्भात पुन्हा एकदा जागरूकता आणि कायद्याची गरज अधोरेखित झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*