मुंबई : राज्यात इंधन टंचाईमुळे लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारनेही सद्यस्थितीत लॉकडाऊनचा कोणताही विचार नसल्याचे जाहीर केले असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे फेसबुक, एक्स किंवा व्हॉट्सअॅपवर खोटी माहिती पोस्ट करणे किंवा फॉरवर्ड करणे हा गुन्हा ठरेल. अशा प्रकारच्या अफवा पसरवून जनतेमध्ये भीती निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादन शुल्कात प्रति लिटर 10 रुपयांची कपात करून सामान्य नागरिकांना दिलासा दिला असल्याचे त्यांनी नमूद केले. आखाती देशांतील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले असले तरी भारताने उत्तम व्यवस्थापन करत नागरिकांवर त्याचा भार पडू दिलेला नाही, असे ते म्हणाले.

पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये इंधन टंचाईमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना भारतात पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सुमारे एक महिन्याचा पेट्रोल-डिझेल साठा उपलब्ध असल्याने कोणतीही घाबरण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच नागरिकांना विनंती करताना त्यांनी सांगितले की, अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपांवर अनावश्यक रांगा लावू नयेत. जास्तीचे इंधन साठवून ठेवल्यास कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे नेहमीप्रमाणेच आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/E8LjDsy4JpoKzFHBA67enK?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

482 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क