सिल्लोड : तालुक्यातील शिवना येथे बुधवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. खेळता-खेळता शेततळ्यात पडल्याने दोन सख्ख्या चिमुकल्या भावांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून आई-वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
मृत मुलांची नावे गौरव रामदास साबळे (१२) आणि गोपाल रामदास साबळे (१०) अशी आहेत. दोघेही शिवना येथील रहिवासी असून अत्यंत गरीब कुटुंबातील होते. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी वडील रामदास साबळे हे शिवारातील शेतात मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत दोन्ही मुलेही शेतात गेली होती. काही वेळाने रामदास साबळे यांनी मुलांना जवळच्या शेततळ्याजवळ न जाण्याची सूचना करून तेथून निघून गेले. मात्र खेळता-खेळता दोन्ही मुले शेततळ्याच्या काठावर गेली आणि अचानक त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले.
शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांनाही बाहेर येता आले नाही. काही वेळानंतर आसपासच्या नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
या घटनेनंतर साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडिलांचा आक्रोश पाहून गावकरीही भावूक झाले. गावात शोककळा पसरली असून अनेकांनी साबळे कुटुंबाला धीर दिला. परिसरातील नागरिकांनी शेततळ्यांभोवती सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे पालकांनी लहान मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे. गावात दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित करण्याची तयारी ग्रामस्थांकडून सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*