छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील डोमचा भाग अचानक कोसळून दोन निष्पाप महिलांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात प्रकाश सदाशिव पाटील (६०), श्रीकांत गंगाधर गायकवाड (६७) – दोघेही नाशिकचे रहिवासी, तसेच जयश्री किसन नाडे (६३), आर्किटेक्ट आमरेश जोशी (५३) आणि प्रकल्प सल्लागार दीपक ए. पाटील (६०) – हे तिघे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे.
या दुर्घटनेत स्वाती खैरनार (३७, रा. रांजणगाव शेणपुंजी) आणि रेखा गायकवाड (६५, रा. हडको) यांचा मृत्यू झाला, तर अकिल शेख रहिम (३२, रा. पडेगाव) हे जखमी झाले आहेत.
सदर काम २००६ साली प्रकाश डेव्हलपर्स अँड जे.व्ही. या संस्थेला बीओटी तत्त्वावर देण्यात आले होते. नंतर अनेक फर्म, सहविकासक व आर्किटेक्ट यांच्या सहभागातून हे बांधकाम २०२२ मध्ये पूर्ण झाले. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत दर्जाहीन साहित्य वापरण्यात आले, अशी माहिती महापालिकेच्या तक्रारीतून समोर आली आहे.
या घटनेवरून महापालिकेच्या देखरेखीतील ढिसाळ कारभारावर तीव्र टीका होत असून, सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पोलिसांनी एफआयआरनुसार पुढील चौकशी सुरू केली असून, चौकशीअंती दोषींवर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*