देशभरात उद्या म्हणजेच ९ जुलै रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले असून, तब्बल २५ कोटींपेक्षा अधिक कामगार, शेतकरी व कर्मचारी विविध मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारच्या “श्रमिक व शेतकरी विरोधी धोरणां”च्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.
या बंदमध्ये १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांचा सहभाग असून, बँकिंग, विमा, डाक, कोळसा, औद्योगिक क्षेत्र, वीज वितरण, परिवहन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे अनेक शहरांमध्ये बँका, सार्वजनिक वाहतूक सेवा, सरकारी कार्यालये यांचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
शेतकरी संघटनाही या आंदोलनात उतरल्याने काही राज्यांमध्ये रस्ते आणि महामार्ग अडवले जाण्याची शक्यता आहे. परिणामी, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे.
आरबीआयच्या सुट्टीच्या यादीत ९ जुलै ही तारीख नसल्याने बँकांना बंद ठेवण्याचे आदेश नाहीत. मात्र, आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांमुळे काही शाखांमध्ये सेवा बाधित होऊ शकते. शाळा आणि महाविद्यालयांबाबत कोणतेही बंदीचे निर्देश नाहीत, परंतु काही ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अडचणी येऊ शकतात.
भारत बंद शांततेत पार पडावा यासाठी सर्व संघटनांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी बंदमुळे सामान्य नागरिकांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*