छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीत वाढत्या अतिक्रमणावर लगाम बसवण्यासाठी प्रत्येक शहरातील रस्त्यांची भूमिअभिलेख व नगररचना विभागाच्या माध्यमातून संयुक्त मोजणी करून सीमांकन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी नगरपालिका प्रशासन शाखेची आढावा बैठक पार पडली.
बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, मुख्याधिकारी संभाजी देशमुख, बी. यु. बिघोत, पी. पी. अंभोरे, समीर शेख, कारभारी दिवेकर, ज्ञानेश्वर ठोंबरे, संतोष आगळे, सहायक आयुक्त ऋषिकेश भालेराव आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०, अनुकंपा भरती, विभागीय परीक्षा, घनकचरा व्यवस्थापन, शहर सौंदर्यीकरण अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरुळ येथील घ्रुष्णेश्वर मंदिरात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी मोजणी करून रस्ते मोकळे करावेत.
त्याचबरोबर सर्व नगरपालिकांनी संयुक्त मोजणी करत सीमांकनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश दिले.
प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात झिरो पेंडसीचा संकल्प ठेवावा, नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्यावेत, ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ सर्व्हेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा, तक्रार निवारण दिन निश्चित करावा, ई-ऑफिस प्रणाली राबवावी आणि प्रभाग रचना वेळेत पूर्ण करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L1Hjnh1fHKDJBUpjMQYvag?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*