मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी आज सरकारवर तीव्र निशाणा साधला. आंदोलनासाठी रोजच्या रोज फक्त एका दिवसाची मुदतवाढ देण्याऐवजी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. “सरकारने मला काल परवानगी दिली, आज पुन्हा एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. असा भंगार खेळ करण्याऐवजी सरकारने खरे राजकारण करावे. गोरगरिबांच्या मुलांना आरक्षण दिले, तर मराठा समाज आयुष्यभर सरकारला विसरणार नाही,” असे ते म्हणाले.
आंदोलनादरम्यान आंदोलकांना अन्न-पाण्यापासून वंचित ठेवण्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. जरांगे म्हणाले, “मराठा समाजाच्या मुलांना लघवी करण्याचीही सोय नाही. वडापाव, पाणी यासाठी दुकाने बंद आहेत. मराठ्यांनी कंटाळून मुंबई सोडून जावे, असा डाव आहे. सरकार इंग्रजांपेक्षाही क्रूर झाले आहे.”
मनोज जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला की, “मी उपोषण करून मेलो तरी चालेल, पण या मुलांसाठी दुकाने बंद ठेवू नका. अन्यथा, तुमच्याकडे सभा झाली तर आम्हीही पाणी बंद करू, दुकाने बंद करू.”
त्यांनी स्पष्ट केले की ही लढाई आता आरपारची आहे. “एकतर सरकारने आरक्षण द्यावे किंवा मी मरेन. आता फक्त आश्वासने नकोत, तर आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” असे जरांगे यांनी ठामपणे सांगितले.
मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले हे उपोषण राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडवणारे ठरत आहे. पुढील काही तासांत सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*